0-------- Now the blog "Swings of Mind - स्पंदन" is not added in the list of 'Marathi Blog Vishva', so if you want to read new posts on the blog, then please subscribe this blog by saving the url http://swingsofmind.blogspot.in/ or follow this blog by email. --------0 + 0-------- "Swings of Mind - स्पंदन" हा ब्लॉग आता ’मराठी ब्लॉग विश्व’च्या यादीत समाविष्ट नाही, त्यामुळे जर आपल्याला ब्लॉगवरील नवीन नोंदी वाचायच्या असतील तर त्यासाठी कृपया http://swingsofmind.blogspot.in/ हा यूआरएल पत्ता साठवून हा ब्लॉग सबस्क्राईब करा किंवा आपल्या ईमेलद्वारे ब्लॉगचा मागोवा घ्या. --------0

Wednesday, April 22, 2009

माझे "मी"पण हरवले

मला अजूनही हे कळत नाही, की हे सत्य आहे, की आभास? की मी एखादे स्वप्न बघतेय जागेपणी? की ज्यांना मी माझ्या भूतकाळातील स्मृती समजत होते, त्या माझ्या भूतकाळातल्या स्मृती नसून, तेच एक मोठे दुःस्वप्न होते? नेमके काय खरे आहे? माझ्या भावना खर्‍या आहेत, की बुद्धीला जे जाणवतं आहे ते खरं आहे? माझी बुद्धी वापरून मी माझ्याच भावनांचा खरेखोटेपणा तपासायला हवाय! पण सरळमार्गाने जाऊन काहीही साधणार नाही, उलट हया चक्रव्यूहात मी जास्तच गुंतत जाईन. पण कृष्णनीतीने वागून सत्य शोधायला गेले, तर त्यासाठी मला माझ्या तत्वांना मुरड घालावी लागेल. "मोडेन पण वाकणार नाही", की "वाकेन पण मोडणार नाही", ह्यातले नेमके काय निवडायचे? की कधी थोडे वाकल्यासारखे दाखवायचे, कधी थोडे मोडल्यासारखे दाखवायचे आणि योग्य वेळ आल्यावर वाकणारही नाही आणि मोडणारही नाही असेच ठणकावून सांगायचे? पण ह्या सार्‍यातून नेमके सत्य शोधतांना माझ्या 'मी'पणाच्या मात्र पार चिंधड्य़ा चिंधड्या झालेल्या असतील, एवढे मात्र निश्चित! अजूनही एक मार्ग आहेच, की सत्याचा कधीच शोध घ्यायचा नाही, ज्या गोष्टीमागचे सत्य मी शोधू पाहतेय, तिचाच त्याग करायचा. पण मग मनाची होणारी तगमग? तिचे काय करायचे? काहीही केले तरी या सार्‍यात माझी मनःशांती हरपणार हे निश्चित!

पण मुळात माझ्याच वाट्याला हे का यावे? मला माहिती आहे, या प्रश्नाला काहीही अर्थ नसतो. प्रत्येकाच्या वाट्याला असे काही ना काहीतरी येतच असते. पण ज्या अतर्क्य शक्यतांचा मी फ़ारसा विचार केला नव्हता त्याच आता एखाद्या भेसूर राक्षसासारख्य़ा माझ्यापुढे मोठा बागुलबुवा करून उभ्या राहिल्या आहेत. ह्या सार्‍या एखाद्या चित्रपटात किंवा कथा कादंबरीतच शोभाव्या अशा घटना माझ्याबाबतीत घडतील अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. पण आता त्या घडत आहेत आणि त्यांचा शेवट कसा होणार आहे याबाबत मी कोणतेही अंदाज करू शकत नाहीये. आधी मला असे वाटायचे, की 'चित्रपटात फ़ारच अतिरंजित घटना दाखवतात. या चित्रपटात दाखवल्या जाणार्‍या किंवा कादंबर्‍यात रसभरीतपणे वर्णन केलेल्या घटना प्रत्यक्षात कधीतरी घडणे शक्य आहे का?' पण आता मी ठामपणे सांगू शकते, की ह्यापेक्षाही अतर्क्य गोष्टी आपल्या जीवनात घडू शकतात.

मला हेही माहिती आहे, की मी माझ्या आयुष्यात घडणार्‍या या अतर्क्य गोष्टी मी माझ्या आत्मचरित्रात लिहिल्या तर त्याएवढे वैचित्र्यपूर्ण असे दुसरे आत्मचरित्र असणार नाही. पण मी हेही प्रांजळपणे सांगू इच्छिते, की मी माझे आत्मचरित्र लिहीणार नाही आणि ते लिहावे असेही आत्ता मला वाटत नाही. कदाचित अजून काही वर्षांनी मनाला आलेल्या प्रगल्भतेमुळे मी आत्मचरित्र लिहेनही, पण आत्ता मला भेडसावत असलेल्या समस्येचा त्यात कितपत उल्लेख असेल, कोणास ठाऊक? असे नाही, की मी माझ्या जीवनाकडे तटस्थपणे बघू शकत नाही. पण कदाचित त्यामुळेच मी आत्मचरित्र लिहू इच्छित नसेन. एक शक्यता मात्र आहे, माझ्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटना आणि काही कल्पना याचे मिश्रण करुन मी एक सुरस कादंबरी लिहेन कदाचित. पण या सार्‍या शक्यताच!

आणि हे सारे कशामुळे घडले? मला असे वाटत होते, की एखाद्या कल्पित घटनेला खोट्या वास्तवाची जोड देऊन, त्यासाठी कल्पित, खोटे पुरावे देऊन, ती नसलेली गोष्ट आहे असे भासवले जात आहे. पण आता अचानक एक अशी गोष्ट उजेडात आली आहे, की त्यावरून वाटते, योगायोगाने आणि अनपेक्षितपणे प्रत्यक्ष हाती लागलेल्या एका महत्त्वाच्या खोट्या पुराव्याला, कल्पित घटनांचा आधार देऊन, आणि मग इतर खोट्या गोष्टींची जोड देऊन हा सारा बागुलबुवा उभा केला गेला आहे. मला सिद्ध करायचे आहे, ते म्हणजे तो महत्त्वाचा पुरावाच खोटा असल्याचे. हे सारे एखाद्या वकिलाचे काम असल्यासारखे वाटते. पण आता मला जाणवतेय, जर मी त्या आणिबाणीच्या क्षणी वकिलाची मदत घेतली असती, आणि काय पुरावा आहे या तुम्ही उभ्या केलेल्या बागुलबुव्याचा म्हणून ठणकावून विचारले असते, तर तत्क्षणी तो पुरावा माझ्या तोंडावर फ़ेकून मला तोंडघशी पाडले गेले असते.

तो पुरावा हा खोटाच पुरावा आहे, असे मला वाटतेय, ते मला सिद्ध करावेच लागेल. पण जर तो पुरावा १००% खरा असल्याचे सिद्ध झाले तर.. तर.. तर............मी माझ्या आयुष्याच्या लढाईत अगदी जाणवण्याइतपत परिणामकारकरित्या इतकी मागे फ़ेकली जाईन, की पुन्हा ते अंतर तेवढ्याच वेळात पार करून माझे ध्येय साधणे मला परत कधीही शक्य होणार नाहीये. शिवाय माझ्या भावनांनी माझ्या बुद्धीवर मात केल्याचे शल्य मला आयुष्यभर जाणवत राहील ते वेगळेच. त्यामुळे माझ्या आयुष्याची ही लढाई (होय लढाईच) मला जिंकावीच लागणार आहे. मी इतके सारे लिहिले, तरिही स्पष्टपणे तुम्हांला काहीच समजले नाही, हे मला माहित आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे या गुंत्याबाबत मला मोकळेपणी काहीच लिहिता येणार नव्हतेच. पण मग तरिही मी इतके सारे अनाकलनीय लेखन का केले? त्याचे उत्तर एकच, मन मोकळे झाले. आता मी निदान नीट विचार करून नव्याने शोध घेऊ पाहत आहे, माझ्या हरवलेल्या "मी"पणाचा! जे हरवले ते कधी गवसेल का कधी मला, मन माझे हे विचारत आहे!!!!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...